कणकवली : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असतानाच गुरुवारी दुपारी कणकवली, वैभववाडी तालुक्यांत तसेच कसाल परिसरासह अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. कणकवली, वैभववाडी तालुक्यांच्या काही भागांत गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही प्रमाणात वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत अक्षरशः सूर्य आग ओकत होता. साधारणपणे 2.30 ते 3 वा.च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसास सुरुवात झाली. कणकवली, वैभववाडी तालुक्यांतील काही भागांत गारपिटीसह पाऊस झाला. चिमुकल्यांनी या गारा गोळा करण्याचा आनंद लुटला. सुमारे अर्धा ते एक तास पावसाची रिपरिप सुरूच होती. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कनेडी, हरकुळ बुद्रुक, नाटळ, नांदगाव, कासार्डे, तळेरे आदी परिसरातही पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेमुळे वीजपुरवठा काही भागांत खंडित झाला होता.