इन्सुली येथे नळयोजनेचे शेकडो पाईप आगीत बेचिराख 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : इन्सुली येथे नळयोजनेचे शेकडो पाईप आगीत बेचिराख

शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

बांदा : इन्सुली ग्रामपंचायत अंतर्गत नळपाणी योजनेसाठी आणून ठेवलेल्या पाईपांना शनिवारी सायंकाळी बिलेवाडी येथे भीषण आग लागून शेकडो पाईप जळून खाक झाले. या घटनेत शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे परिसरातील बागायतीला मोठा फटका बसला आहे.

इन्सुली नळपाणी योजनेची मुख्य लाईन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईप आणण्यात आले होते. हे पाईप गेल्या तीन वर्षांपासून बिलेवाडी येेथे भरवस्तीत उघड्यावर होते. शनिवारी सायंकाळी अचानक या पाईपांना आग लागली. वाऱ्याचा वेग असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आटोक्यात आणणे कठीण झाले. ज्या ठिकाणी पाईप ठेवले होते तो परिसर बागायतीचा असल्याने आगीची झळ आजूबाजूच्या शेतीला बसली. यात नारळ, सुपारी तसेच इतर फळझाडांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच उपसरपंच नमिता नाईक, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर तसेच बिलेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

दरम्यान, नळपाणी योजनेचे पाईप तीन वर्षांपासून येथे पडून असून काम का पूर्ण झाले नाही? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. भरवस्तीत आणि बागायती क्षेत्रात ज्वालाग्राही पाईप निष्काळजीपणे ठेवल्यामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बिलेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT