कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतीय नागरिक म्हणून आपण मोकळा श्वास घेतो. प्रत्येकाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा हात आहे. संविधान दिवसाच्यानिमित्ताने आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या विचारांवर, विचारांची प्रेरणा घेवून आपापल्या पध्दतीने संविधानाची ताकद घट्ट करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. वर्षोनुवर्षे ज्या वाड्या वस्त्यांना जातीवाचक नावे दिली होती ती नावे बदलून संविधानाच्या अधीन राहून नवीन नावे दिली आहेत, असे करणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
कणकवली बुध्द विहार येथे बुधवारी सायंकाळी संविधान दिना निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार मयुरी चव्हाण, गौतम खुडकर, अशोक कांबळे, राजू चव्हाण, विनायक तांबे, किरण जाधव, सुशील कदम, अजित तांबे, तुकाराम फोंडेकर, सुभाष कदम, सिद्धार्थ जाधव, महेंद्र जाधव, वैभव जाधव, तेजस कांबळे, प्रदीप खुडकर यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अल्पसंख्यांक विभागाचे निसार शेख आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, आपल्या संविधानाची ताकद आपण अनुभवत असतो. आपण आजुबाजुच्या राष्ट्राकडे पाहतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकद निश्चितच मोठी आहे, हे दिसून येते. यावेळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला. तसेच बुध्दविहार मधील भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेसही त्यांनी अभिवादन केले.