मिरज : सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मिरज यांच्यावतीने ‘सोलर सिस्टिम बसवताना लागू असलेले नियम व बदलते धोरण’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये वीज कंपनीच्या सोलर धोरणाला उद्योजकांनी तीव्र विरोध केला आहे.
अनेक उद्योजकांनी लाखो रुपये खर्च करून उद्योगांमध्ये सोलर सिस्टिम बसवली, मात्र सरकारच्या बदलत्या नियम व धोरणांमुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे, असे मत चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू यांनी मांडले. सोलर प्रकल्पांमधून अपेक्षित फायदा होत नसून वीज बिलामध्ये मोठी तफावत जाणवत असल्याचे मत चेबरचे संचालक प्रशांत शहा यांनी व्यक्त केले.
ग्रीड सपोर्ट चार्जेसमुळे प्रति युनिट 1.96 रुपयांचा अतिरिक्त भार पडत असून, हे शुल्क उत्पादित होणाऱ्या सर्व विजेवर आकारले जात असल्याने त्याच्या न्याय्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहे, असे चेंबरचे संचालक रमेश आरवाडे यांनी सांगितले. बँकिंग नियमांमधील बदलांमुळे सौरऊर्जेचा वापर मर्यादित झाला असून, पीक अवर्समध्ये खर्च कमी करण्याची संधी कमी झाली, अशी तक्रार संचालक माधव कुलकर्णी यांनी केली. यावेळी महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आशिष मेहता, ज्येष्ठ संचालक संजय आराणके, संजय खांबे, हर्षल खरे आदी उद्योजक उपस्थित होते. उद्योजक सूर्यकांत नलवडे, संचालक दीपक शिंदे यांनी उद्योजकांच्या अडचणींबाबत रोखठोक मनोगत व्यक्त केले व याबाबत लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.