सावंतवाडी : भरधाव कार चालकाला डुलकी लागल्याने नेमळे-एरंडोकवाकवाडी येथे हायवेवरून पंधरा फूट खोल शेतात आदळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर एकाचा गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान असे मिळून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गोव्यातील दोन तर भिरवंड (ता. कणकवली) येथील एकाचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी दु २ वा.च्या सुमारास झाला. मृतांमध्ये दोन सख्या बहिणी व भावोजी यांचा समावेश आहे.
विलासिनी जगन्नाथ सातार्डेकर (६९ रा. भिरवंडे कणकवली), श्रीमती पांडुरंग नानोडकर (६३) व पांडुरंग विष्णू नानोडकर (६५, दोघेही रा. गिरी, गोवा) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात थार चालक व अन्य एक महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कार घेऊन चालक सनी नानोडकर हा गोवा सालीगाव गिरी येथून कणकवली, भिरवंडे येथे जात होता. त्यांच्या सोबत गाडीत चार जण होते. दुपारी चालकाला डुलकी लागल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला व थेट मुंबई-गोवा महामार्गावरून पंधरा फूट खोल शेतात कोसळली. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. नेमळे ग्रामस्थांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना ही पाचारण करण्यात आले. गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे विलासिनी सातर्डेकर व त्यांची बहीण श्रीमती नानोडकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांंनी घोषित केले. चालक सनी नानोडकर, पांडुरंग नानोडकर व उज्ज्वला कांबळी यांना अधिक उपचारांसाठी गोवा- बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे संध्या. ६ वा. उपचार सुरू असतानाच गंभीर जखमी पांडुरंग विष्णू नानोडकर यांचाही मृत्यू झाला.
अपघाताची भीषणता एवढी होती की, यात कारचा चक्काचूर झाला. विलासिनी नानोडकर या आठ दिवसांपूर्वीच भिरवंडे येथून गोवा येथे आपली बहीण श्रीमती नानोडकर यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पुन्हा भिरवंडे येथे सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.