आंबोली : संकेश्वर-बांदा मार्गावर आंबोली-नांगरतासवाडी येथे ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली. बुधवारी स. ८ वा. च्या सुमारास झालेल्या या अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.
माणगाव-कट्टावाडी (ता. कुडाळ) येथील केशव दत्ताराम केसरकर (वय २७) व संतोष रामचंद्र धुरी (३२) हे कार घेऊन आंबोलीमार्गे आजरा येथे जात होते. नांगरतास येथे आंबोलीकडे येणाऱ्या ट्रकची त्यांच्या कारशी धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रकच्या धडकेनंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.
प्राथमिक माहितीनुसार अपघातावेळी ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे. या अपघातात कारमधील केशव केसरकर आणि संतोष धुरी यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी जात स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढले आणि आंबोली प्रा. आ. केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता बांबुळी (गोवा) येथे नेण्यात आले.