मळगाव : आडेली-खुटवळवाडी ग्रामस्थांना अडीच वर्षे पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न नळपाणी योजनेचे काम पूर्ण करून मर्गी न लावल्यास पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ले सभापती शंकर घारे यांना दिला.
आडेली-खुटवळवाडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम गेली सुमारे अडीच वर्षे अपूर्णावस्थेत असल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत आडेली-खुटवळवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. झालेल्या चर्चेनंतर सभापती शंकर घारे यांनी आडेली ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, आडेली -खुटवळवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. सदर नळयोजनेच्या कामाचे भूमिपूजन २०२४ मध्ये आडेली सरपंच कोंडसकर यांनी केले आहे. या अडीच वर्षात ठेकेदाराने पाण्याची टाकी बांधून ठेवली आहे. पण पाईपलाईन व नळ कनेक्शनचे काम अजूनही सुरू केलेले नाही. यासंबंधी ग्रामस्थांनी वेळोवेळी सरपंचांचे लक्ष वेधले आहे. पण आडेली सरपंच यांनी याविषयी अजूनही काही कारवाई केली नाही. त्यामुळे या कामाची योग्य ती चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व दोषीवर कार्यवाही करण्यात यावी. येत्या एक महिन्यात काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ ग्रामपंचायत व पंचायत समिती समोर घागर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आडेली सोसायटीचे माजी चेअरमन समीर कुडाळकर, नरहरी सोनसूरकर, दीपक गडेकर, सुभाष नाईक, सुनील गडेकर, जीवन कुडाळकर, उमेश शेणई, कृष्णा राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आडेली-खुटवळवाडी ही योजना केळूसकर घराजवळील विहिरीवरून प्रस्तावित आहे. त्यामुळे याबाबत सदर प्रस्तावित विहिरीवरून योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सदर काम त्वरित सुरु करण्यात यावे, यासाठी संबंधित ठेकेदारास त्वरित पत्र देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे यांनी दिली.