women murder in Sawantwadi case - father son arrested
सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये - मधलीवाडी येथे जमीन तसेच मोबाईल वरून शुटिंग काढण्याच्या वादातून कोयत्याने डोक्यावर वार करून महिलेची हत्या केल्याप्रकरणी संशयित विजय कृष्णा सावंत व रघुनाथ विजय सावंत या बाप-बेट्याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्यात हल्ल्याचे अन्य कोणते कारण आहे का? तसेच वार करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त करणे आदी तपास कारणासाठी पोलीस कोठडी देण्यात आली. सोमवारी संध्याकाळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी संशयिताना घेऊन घटनास्थळी जात तपास केला. ओवळीये मधलीवाडी येथील सरस्वती सावंत व संशयित विजय सावंत, रघुनाथ सावंत यांची पूर्वीपासून जमीन जागेवरून वाकडीक होती. या कारणाने दोन्ही कुटुंबात सतत वाद होत असत. रविवारी संध्याकाळी जमिनीचे मोबाईलने शुटिंग करण्यावरून वाद झाला आणि हा हल्ल्याचा प्रसंग घडला.
यातील संशयितांना तेथील जागेत पोल्ट्री फार्म उभारायचा होता, त्यासाठी ते आपल्या मोबाईलने जागेचे व्हिडिओ शूटिंग करत होते. दरम्यान त्यांनी काही झाडे तोडण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच सरस्वती सावंत यांनी त्या ठिकाणी जात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यातून वाद वाढत गेला. त्यानंतर संशयित विजय सावंत यांनी तिला घट्ट पकडून धरले तर रघुनाथ सावंत यांनी कोयत्याने तिच्या डोक्याच्या पाठील बाजूस जोराने हल्ला केला.
ही घटना समजताच त्या महिलेचा मुलगा एकनाथ सावंत याने तिथे जाऊन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याबाबत पोलिसांना कल्पना देण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरस्वती धोंडी सावंत (६५) यांना तातडीनेरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, आंबोली पोलीस मनीष शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या हल्ल्याप्रकरणी मुलगा एकनाथ सावंत याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (६१) व त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांच्यावर कोयत्याने हल्ला करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
रविवारी उशिरा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी या दोन्ही संशयिताना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता त्याना ४ एप्रिल पर्यंत अधिक पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
दोन दिवसापूर्वी चिरे टाकण्यावरून झाला होता वाद !
या हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी जमिनीत चिरे टाकण्याचा कारणावरून मयत सरस्वती सावंत व दोन्ही संशयित यांच्यात वाद झाला होता. हे चिरे आपल्या जमिनीत टाकले आहेत, ते उचलावेत अन्यथा वाद वाढतील असा तक्रार अर्ज सरस्वती सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिला होता. त्यावर पोलिसांनी त्या जमिनीची कागदपत्रे सोमवार पर्यंत सादर करण्याचे आदेश दोन्ही पार्टी ना दिले होते. मात्र नेमका रविवारी हा गंभीर प्रसंग घडला असल्याचे मुलगा एकनाथ सावंत यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी सोमवारी पुन्हा गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. या घटनेने ओवळीये गाव हादरले आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.