सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
आमसभेत आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याच्या मुद्द्यावरून सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी चांगलीच गाजली. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे सदस्य उदय पारिपत्ये यांनी "उषा इस्पात ते सातलोसे हा रस्ता गणेशचतुर्थीपूर्वी दुरुस्त करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले?" अशी विचारणा करत आमदारांच्या निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी केली.
त्याला सत्ताधारी शिवसेना व भाजप पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. अखेर उपसभापती गौरव मुळीक यांनी यात हस्तक्षेप करत याबाबत आमदार केसरकर यांच्यासोबत चर्चा करून प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिल्याने वादावर पडदा पडला.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा तालुका स्कूल सभागृहात पार पडली. यावेळी आमसभेत ठराव घेतलेल्या कामांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचा मुद्दा गाजला.
उदय पारिपत्ये म्हणाले, "आमसभेत आमदार दीपक केसरकर यांनी उषा इस्पात ते सातलोसे हा पंचक्रोशीतील रस्ता गणेशचतुर्थीपूर्वी सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा पाठपुरावा करून निपटारा करण्याची जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाची नाही का?" असे सांगत याप्रश्नी आमदार केसरकर यांनी आश्वासन न पाळल्याने त्यांचा निषेध व्यक्त करतो. तसा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी केली.
त्याला सत्ताधारी शिवसेना सदस्यांनी विरोध केला. सभापती सुस्मिता जाधव यांनी "तुम्ही अशी मागणी करू शकत नाही", असे सांगितले. त्यावर सदस्य उदय पारिपत्ये यांच्या या वक्तव्यात सदस्या प्रियंका देसाई आणि शरद धाऊसकर यांनी उडी घेत मागणीला विरोध केला.
अखेर उपसभापती गौरव मुळीक यांनी सदस्यांना शांत करत आमसभेत मांडलेल्या सर्व प्रश्नांचे त्यांचे काय झाले, तसेच त्याचा निपटारा का झाला नाही? यासंदर्भात आमदार केसरकर यांच्याशी चर्चा करू व अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून प्राधान्याने उषा इस्पात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, लवकरच बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.
या चर्चेत सदस्य महेश धुरी व प्राजक्ता केळुसकर यांनीही भाग घेत निषेधाचा ठराव होऊ नये असे सांगत सदस्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावा असे स्पष्ट केले. १५ व्या वित्त आयोगाची कामे मंजूर केली जात नाही तोपर्यंत १६ व्या वित्त आयोगाची कामे घेऊ नयेत, असा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला. नाणोस-तिरोडा पुलाप्रकरणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे झाले आहे. सदर पूल नव्याने बांधण्यास घ्यावे असे सदस्य जितेंद्र गावकर यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा हायवेवरील इन्सुली-खामदेव नाका येथील ब्रीजकम पूल निकृष्ट दर्जाचे झाले आहे, त्यामुळे या हायवेची पाहणी येत्या ३० सप्टेंबरला सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांनी करावी असा निर्णय घेण्यात आला.
गटविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी सेवा अभियानाबाबत माहिती दिली. सदस्य गावकर यांनी ग्रामसेवक जर ग्रामसभेला सचिव म्हणून उपस्थित राहत नसेल तर त्यावर निर्णय घ्यावा असे सूचित केले. शिक्षण विभाग विषयासंदर्भात पोषण आहाराचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. यावेळी सभापती जाधव यांनी आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पाहणी केली आहे. तसेच यापुढे पोषण आहार योग्य पद्धतीत दिला जाईल, तसे न झाल्यास कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
सदस्य धुरी यांनी "आम्ही काही राष्ट्रीय बांधकाम विभागाचे १३ मुद्दे मागील बैठकीत उपस्थित केले होते, त्याचे काय झाले?" असा सवाल केला. सदस्य मायकल डिसोजा यांनी कणकवली-आजरा बस बंद करू नये अशी मागणी केली.
"शाळांना ४ सावंतवाडी येथे पदवीधर शिक्षक पद रिक्त आहे त्यावर काय निर्णय झाला?" असे उपसभापती गौरव मुळीक यांनी विचारताच "पदवीधर शिक्षक भरणा झालेली नाही, ९१ शिक्षण सेवक भरती करण्यात आली आहे, तालुक्यात ते देण्यात आले आहेत," असे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी स्पष्ट केले. सदस्या अवनी राऊळ, प्राजक्ता केळुसकर, उत्कर्षा गावकर यांनी "आम्ही प्रश्न विचारतो पण त्यांची उचल घेतली जात नाही," त्यावर नाराजी व्यक्त केली.
सदस्य मायकल डिसोजा यांनी "जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करू नका," असे सांगत "जिल्ह्यात शिक्षक भरती होतात आणि नंतर ते जिल्हा सोडून जातात, त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करताना विचार करावा," अशी मागणी केली.
उदय पारिपत्ये यांनी "मतदारसंघात बिबटे, हत्ती गवारेडे यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच बिबट्यामुळे एका मुलीला जखमी व्हावे लागले. याबाबत गंभीरतेने विचार करावा आणि उपाययोजना केल्या जाव्यात," अशी मागणी केली.
सर्व सदस्यांनी आम्ही प्रश्न विचारतो. मात्र, प्रशासन ते गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित करायचे की नाही? असा सवाल करत, जर आमच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसेल तर सभेचा उपयोग काय? असा प्रश्न करत प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गटविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी १५ वित्त आयोगासंदर्भात आपण वरिष्ठांकडे प्रश्न उपस्थित करून निकाली काढू, तसेच अपूर्ण कामे निश्चितपणे पाठपुरावा करून पूर्ण करून घेऊ असे आश्वासन दिले.
रस्ताआमसभेतील आश्वासनानंतरही काम अपूर्ण राहिल्याने आ. केसरकरांच्या निषेधाची मागणी. आमदार केसरकर यांच्याशी चर्चा करून प्रश्न प्राधान्याने सोडवणार. १५ वा व १६ वा वित्त आयोग१५ व्या वित्त आयोगाची कामे मंजूर होत नसल्याची तक्रार. १५ व्या वित्त आयोगाची कामे मंजूर होईपर्यंत १६ व्या वित्त आयोगाची कामे न घेण्याचा ठराव.
नाणोस-तिरोडा व इन्सुली पूलठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम खराब; हायवेवरील पूल निकृष्ट दर्जाचा. नाणोस पूल नव्याने बांधणे व ३० सप्टेंबरला इन्सुली पुलाची प्रत्यक्ष पाहणी करणार. शिक्षक भरती व कार्यमुक्तीपदवीधर शिक्षक पदे रिक्त; शिक्षक भरतीनंतर जिल्हा सोडण्याचे प्रमाण. ९१ शिक्षण सेवक रुजू; शिक्षकांना कार्यमुक्त करताना विचार करण्याची मागणी. वन्यजीवांचा उपद्रवमतदारसंघात बिबटे व हत्ती-गवारेडे यांचा वाढता वावर व मुलीवरील हल्ला. वन्यजीवांच्या वावरावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी.