सावंतवाडी ः तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे जमिनीच्या वादातून सरस्वती सावंत या महिलेची कोयत्याने वार करून हत्या केल्याप्रकरणी संशयित रघुनाथ सावंत आणि विजय सावंत या बाप-लेकांना शनिवारी न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोबाईलवरून सुरू असलेल्या चित्रीकरणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान या भीषण हत्याकांडात झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना आणि तपासातील खुलासे
ओवळीये येथील सामाईक जागेच्या वादावरून दोन्ही कुटुंबात आधीपासूनच तणाव होता. रविवारी संशयित मोबाईलवरून वादग्रस्त जागेचे शुटींग करत असताना हा वाद पुन्हा उफाळून आला. रागाच्या भरात रघुनाथ सावंत याने सरस्वती सावंत यांच्या हातातील कोयता हिसकावून घेत त्यांच्या डोक्यावर वार केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान संशयित रघुनाथ सावंत याने या कृत्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.=
पोलिस कारवाई आणि जप्ती
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला कोयता जप्त केला असून, या गुन्ह्यात जमिनीच्या वादाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
न्यायालयीन कस्टडी
पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे ओवळीये परिसरात अद्यापही भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.