कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नडगिवे येथील सिद्धिविनायक हॉटेलसमोरील अवघड मयत वळणावर सीएनजी गॅस भरून तळेरे येथून खारेपाटणकडे परतणाऱ्या संदीप दिलीप पाटील (४२, रा. खारेपाटण रामेश्वरनगर) यांची रिक्षा रविवारी रात्री १२ च्या सुमारास पलटी झाली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेने खारेपाटण परिसरावर शोककळा पसरली आहे. संदीप पाटील हे स्वतःची रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी रात्री ११ वा. च्या सुमारास ते तळेरे पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून परतत असताना, नडगिवे येथील अवघड वळणावर त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी झाली.
या अपघातात संदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. माजी सरपंच गुरुप्रसाद शिंदे यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. संदीप पाटील रमाकांत राऊत आणि पं. स. सदस्य संदीप पाटील हे कष्टाळू व्यक्तिमत्व होते. रिक्षा चालवण्यासोबतच त्यांनी काही महिन्यापूर्वी रिक्षा दुरुस्तीचा छोटा गॅरेज व्यवसाय सुरू केला होता. त्यांची पत्नी समृद्धी पाटील या खारेपाटण आरोग्य केंद्रात 'आशा स्वयंसेविका' म्हणून कार्यरत आहेत.
पती पत्नी कष्ट करून मुलांचे भविष्य घडवत असतानाच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
नडगिवे वळण 'ब्लॅक स्पॉट'
नडगिवे येथील हे वळण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. रात्रीच्या वेळी महामा-र्गावर प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने आणि वळणाचा नेमका अंदाज न आल्याने वाहनचा-लकांचा गोंधळ उडतो. संदीप यांच्या बाबतीतही रात्रीच्या अंधारात वळणावर वेग मर्यादेचा किंवा वळण घेण्याच्या अंतराचा अंदाज चुकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावरील असे 'ब्लॅक स्पॉट' आता सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत.