वेंगुर्ले : तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी संपादित जमिनीतून ९ हेक्टर गावठण क्षेत्र वगळण्यात यावे, या मागणीसाठी शिरोडा वेळागरवासियांनी खाडीतील पाण्यात उतरून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनास भूमिपुत्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शेतकरी संघटनेचे सल्लागार जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू अंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, विनोद आरोसकर, शेखर नाईक, बाळा आरोसकर, आजू आमरे, मनोहर नाईक, शेखर नाईक, दिलीप गवंडी, श्रेयस केरकर, दीपा आमरे, महिमा नाईक, शारदा आरोसकर, राजश्री अंदुरलेकर, वनिता आरोस्कर, कुमुदिनी गवंडी, शर्वणी नाईक, शितल नाईक आदीसह शेकडो भुमिपुत्र आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जयप्रकाश चमणकर म्हणाले, जोपर्यंत एमटीडीसी ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची हमी देत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. १९९२ पासून आजतागायत या प्रश्नी दोन वेळा शासन स्तरावर दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. मात्र, स्पष्टपणे वेळागर गावठन क्षेत्र वगळण्याचा निर्णय दिला. तरी अद्याप हे क्षेत्र न वगळल्याने भूमिपुत्र चे हे आंदोलन चालू असून आता निर्वाणीच्य क्षणी पोहचले आहे. वास्तविक ताज गृपला पर्यटनासाठी ६० एकर जागेची आवश्यकता असताना आज त्यांच्या ताब्यात १४२ एकर जागा आहे. पैकी फक्त ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची ज्याठिकाणी भूमिपुत्र ची घरे दारे, शेती , बागायती आहे.ते क्षेत्र वगळण्याची मागणी असताना अद्यापही शासन स्तरावर त्याला दुजोरा मिळाला नाही. अगदी अल्प दराने घेतलेल्या या जनिनीचे क्षेत्र तात्काळ वगळावे, अशी सर्व भूमिपुत्र ची आग्रही मागणी आहे.त्यामुळे हे जल आंदोलन सुरू असल्याचे चमणकर म्हणाले.आमचा पर्यटनाला किंवा प्रकल्पाला विरोध नाही.
९ हेक्टर क्षेत्र वगळण्याचा निर्णय होत नाही , तोपर्यंत ताज प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येऊ नये.गावठान क्षेत्र वगळण्याची आमची मागणी मान्य झाल्यास आमचे पूर्ण सहकार्य राहील , अशी भूमिका शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू अंदूर्लेकर यांनी मांडली. दरम्यान या भागातील ९ हेक्टर क्षेत्र वगळण्या संदर्भात उद्या गुरुवारी सकाळी ११ वा. प्रांताधिकारी कार्यालय येथे भूमिपुत्र समवेत बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल बनवून जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे व याप्रश्नी लेखी हमीचे आश्वासन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्यानंतर भूमिपुत्रांनी सायंकाळी हे आंदोलन स्थगित केले.