कणकवली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमात ‘काँग्रेसची सत्ता आली तर भारतातील आरक्षण व्यवस्था संपवून टाकू,’ असे वक्तव्य केल आहे. राहुल गांधींच्या या प्रवृत्तीला आणि विचाराला आम्ही विरोध करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही, त्यामुळे या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आरपीआय व महायुतीच्यावतीने 5 ऑक्टोबरला जानवली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ‘आरक्षण बचाव रॅली’ काढण्यात येणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरपीआय जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते. आ. राणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या अधिकारानुसार एसटी समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिला होता, तो संपूर्ण संपुष्टात आणण्याच काम काँग्रेसने केले आहे. त्यात वर्षानुवर्षे हा समाज जो हक्काने समाजामध्ये वावरतो, शिक्षण, नोकरी आणि विविध स्तरांमध्ये त्यांना जो अधिकार मिळतो तो अधिकार काढून घेण्याचे काम आणि आरक्षण संपवण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. जेव्हा असा प्रयत्न राहूल गांधी यांच्याकडून होईल, त्यावेळी देशामध्ये आम्ही त्यांना विरोध करू, असे आ. राणे म्हणाले.
ही आरक्षण बचाव रॅली 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वा. जानवली पूल येथून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत येईल. तेेथे अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी चौक इथे आम्ही सर्व एकत्र जमून कणकवली प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होऊन मान्यवर विचार मांडतील. आम्ही राहुल गांधीच्या या वक्तव्याला स्वीकारत नाही. आमच्या हक्काचेआरक्षण आम्ही कोणालाही विस्कटू देणार नाही, असा संदेश या आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही देणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.
जानवली गावाशी निगडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जुना इतिहास आहे. 1938 साली जानवली नदीकिनारी डॉ. आंबेडकर यांची समता परिषद झाली होती. त्यावेळी काँग्रेसचा पराभव करून परुळेकर नावाचे उमेदवार निवडून आले होते. त्याचमुळे आम्ही जानवली नदी किनार्यापासून ते शहरापर्यंत आम्ही त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राहुल गांधी यांच्या प्रवृत्तीला आणि विचारला विरोध करण्यासाठी आरक्षण बचाव रॅली निघणार आहे. आरक्षण संपविण्याची भाषा राहुल गांधी यांनी स्वतःच केली असून, याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आ. राणे यांनी केले.