कुडाळ : जो हिंदू की बात करेगा..... वही देश पे राज करेगा... हिंदू एकजुटीचा विजय असो... अशा घोषणा देत रत्नागिरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कुडाळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यापासून पोलिस ठाणे व तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी रत्नागिरी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सकल हिंदू समाज अशा घटना सहन करणार नाही. प्रशासनाने अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन काही समाजकंटकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला होता. याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी कुडाळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ही निषेध रॅली काढून पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व तहसीलदार वीरसिंग वसावे यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, भारत माता की जय, हिंदू एकजुटीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी या रॅली दरम्यान करण्यात आली. रणजीत देसाई, वैद्य सुविनय दामले, मिलिंद देसाई, सुरेश कामत, राजू राऊळ, बंड्या सावंत, विवेक पंडित, रमाकांत नाईक, प्रशांत धोंड, मंगेश नाडकर्णी, लवू महाडेश्वर, हेमंत जाधव, दीपक गावडे, अनिल पाटकर, संजय भोगटे, दीपलक्ष्मी पडते, अदिती सावंत, मृणाल देसाई, अंजली चालावलकर, सुरेश आळवे आदींसह सकल हिंदू समाज बांधव यात सहभागी झाले होते.
मिलिद देसाई म्हणाले, रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे परवानगी घेऊन व शांततेने संचलन सुरू होते. या दरम्यान काही काही समाजकंटकांनी हे संचलन रोखण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशांवर कारवाई झाली पाहिजे. जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर आम्ही हिंदू म्हणून गप्प राहणार नाही, जशास तसे उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील या घटनेचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढून पोलिस निरीक्षक व तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंद देसाई, सुरेश कामत, वैद्य सुविनय दामले यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या रॅलीदरम्यान कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.