कणकवली : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही अटी, शर्तीशिवाय मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. इथे शिवसेना वाढली पाहिजे हा आता एकच ध्यास आहे. यासाठी गावागावात जाऊन पक्ष संघटना बळकट करतानाच कार्यकर्ते आणि जनतेची कामे करणे यावर आपण भर देणार आहे.
आम्ही युतीमध्ये आहोत, युतीमध्ये कोणताही बेबनाव होणार नाही, याची दक्षता घेत पक्ष बळकटीचे काम करणार असल्याची ग्वाही शिंदे शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले माजी आ. राजन तेली यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. आ. नीलेश राणे, उपनेते संजय आग्रे, संजय पडते, संदेश पटेल, वर्षा कुडाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राजन तेली म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तो यापुढेही असेल, या दृष्टीने पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही काम करणार आहोत. मंत्री उदय सामंत, आ. नीलेश राणे, आ. दीपक केसरकर या सर्वांचे सहकार्य आपल्याला मिळाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देवून पक्ष संघटना आम्ही वाढवणार आहोत. ठाकरे शिवसेनेतील अनेकजण शिंदे शिवसेनेत येण्यास इच्छुक असून पुढील काही दिवसात गावागावांत प्रवेश होतील, असे राजन तेली यांनी सांगितले.
ठाकरे शिवसेना सोडण्याचे कारण विचारले असता तेली म्हणाले, तो पक्ष वाढावा अशी त्या पक्षात कोणाचीच इच्छा दिसली नाही. इतर पक्ष ज्या पध्दतीने काम करत आहेत तसे काम त्या पक्षात होत नाही. जिल्ह्याचा एकच जिल्हाप्रमुख करावा, अशी आमची मागणी होती. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
राजन तेली यांना त्यांनी जिल्हा बँकेवर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता तेली यांना थांबवत आ. नीलेश राणे यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, राजन तेली यांना सिंधुदुर्ग बँकेच्या नोटीस आल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्याचे उत्तर म्हणून ते बोलले. कोणावर टीका करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. आता ते युतीमध्ये आले आहेत, आता तो प्रश्न राहिलेला नाही. वैयक्तिक कोणावरही टीका होणार नाही. आता मध्ये आपण आहे. त्यांच्याही मनात काही शंका असतील तर त्या दूर केल्या जातील, असे आ. राणे म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांना आ. नीलेश राणे, राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष बळकटीसाठी काम करावे. आमदार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी आहे. राजन तेली आता आमच्याबरोबर आले आहेत, पुढील काळात आणखीही काहीजण येतील, असे आ. राणे म्हणाले. तर राजन तेली यांनीही गावागावात जाऊन पक्ष संघटना बळकट करूया, प्रत्येक बुथवर शिवसेनेचा झेंडा लागेल, असे काम करूया. त्याची सुरुवात कणकवलीतून करणार असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.