कणकवली : दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणीतरी करतात. पहिले परशुराम उपरकर होते, नंतर सतीश सावंत आणि आता राजन तेली आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्ये 'मविआ'कडे एकही उमेदवार नाही, जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल एकही कडवट शिवसैनिक नाही जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो ही खरेतर आश्चर्याची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्याबर सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही. जिल्ह्यात भाजप पक्ष भक्कम आहे, असा टोला भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी लगावला.
कणकवलीत पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी राजन तेलींच्या पक्षप्रवेशाबाबत वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लॉवर समजलं काय? आम्ही फायर आहोत हे ठाकरेंनी लक्षात ठेवावे. ते आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत म्हणून अशा गोष्टी ते करत असतात. दिवाळीच्या अगोदर फटाके कसे फोडायचे हे महायुतीच्या नेत्यांना माहीत आहे, असा इशारा आ. राणे यांनी दिला. जेंव्हा आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत तेंव्हा संजय राऊत यांच्यासारखे तीनपट आमच्यावर खोटेनाटे आरोप करतात, काहीतरी बोलून आपली प्रसिद्धी करून घेण्याचा त्यांचा खटाटोप असतो, शिवसेना उबाठा ही डी कंपनी आहे काय? असा सवाल राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर केला.
राणे म्हणाले, हिंदू द्वेष करणे, हिंदंना टार्गेट करणे, पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे हे सगळे दाऊद गॅंगचे गुण उबाठा सेनेने घेतलेले आहेत. दुसऱ्यांना कोणत्याही गॅंगची उपमा देण्यापेक्षा तुमच्या उबाठा सेनेची डी कंपनी झालेली आहे, त्यावर पहिले लक्ष द्या आणि नंतर आम्हाला नावं ठेवा.
राहुल गांधीना फोन केलेले एक तरी रेकॉर्डिंग राऊतांनी जाहीर करावे. संजय राऊत यांचा फोन राहुल गांधी घेत नाहीत. दहा जनपथच्या ऑपरेटरपर्यंत राऊतांचा फोन जातो आणि इकडे मोठ्या बाता करतात. त्यामुळे संजय यांनी लायकीप्रमाणे महाराष्ट्रामधील नेत्यांशी बोलावे. दिल्लीत तुमच्याप्रमाणे वर्षानुवर्षे काँग्रेसचे राजकारण बदललेले नाही. काँग्रेसची प्रत्येक यादी दिल्ली वरून ठरते त्यामुळे उबाठाने दिल्लीत जावून मुजरे करावेत, असा टोला राणे यांनी लगावला.