देवगड : ‘काही देशविरोधी व कोकणविरोधी शक्ती येथील जनतेची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. देवगडच्या विकासाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर त्याला कदापि सोडणार नाही. आम्ही जनतेचे सेवक असून, त्यांच्या मनातील प्रत्येक गैरसमज दूर करणे आमचे कर्तव्य आहे. मुळात देवगडमध्ये नेमका कोणता प्रकल्प होणार आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडेही नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. पर्यावरणाला हानी पोहोचेल, असा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये किंवा जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही,’ अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडली.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथील विश्रामगृहात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत देवगड तालुक्यात कथित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर सविस्तर भाष्य केले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार ॲड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळा खडपे, सभापती गणेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सुनील पारकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, कथित न्यूक्लिअर प्रकल्प देवगडमध्ये येणार असून यामुळे येथील आंबा व काजू बागायती नष्ट होणार आहेत, अशा पद्धतीने अफवा पसरवून लोकांची डोकी भडकविण्याचे काम करीत आहेत. मुळात प्रकल्पाची माहिती आतापर्यंत कोणाकडे नाही. प्रकल्प कोणता आहे, प्रकल्पात काय होणार आहे, याची माहिती अद्याप शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमच्याकडे अथवा जिल्हा प्रशासनप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनाही नाही.