कुडाळ : सिंधुदुर्गवासीयांनी आम्हाला भरभरुन प्रेम दिले आहे. काही लोक म्हणतील, नीलेश राणे आता दुसर्या पक्षात जाईल. पण मी यापुढे आयुष्यात कुठेही जाणार नाही. ज्या शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या कपाळाला गुलाल लावला, त्यांचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. प्रसंगी मी घरी बसेन; पण शिंदे साहेबांना सोडणार नाही. आज जुन्या केसेस काढून काही लोक मला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी पुढील 25 वर्षे ते मला पराभूत करू शकत नाहीत. खरेतर जिल्ह्यात या पुढे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा विरोधक निवडून येऊच देणार नाही, असा जाहीर इशारा शिंदे शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांनी कुडाळ येथील आभार सभेत दिला.
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेल्या यशाबद्दल शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ एसटी डेपो मैदानावर गुरूवारी रात्री आभार सभा झाली. या सभेत आ. राणे बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यभरात शिवसेना नेते उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार दौरे सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची दुर्देवी घटना घडली. तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक, नागरिकांची विचारपूस तसेच मदत करण्यासाठी श्री. शिंदे जम्मू-काश्मीरला गेले होते. काल रात्रीपासून ते तिकडे होते. त्यामुळे त्यांना या सभेला येण्यास उशीर झाला, याची मला जाणीव आहे. पण या कार्यक्रमावर काही लोक टीका करतील. आपण ऑक्टोबर 2024 मध्ये शिवसेनेत आलो आहे. तेव्हापासून मी आणि दत्ता सामंत शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी मेहनत घेतोय. गावागावांत शिवसेना वाढविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सुरूवातीपासून लढतच आहोत. शिवसेनेच्या धडाक्यामुळे अन्य सगळे पक्ष बिथरले आहेत, असा दावा त्यांनी केला.
आमच्यावर आज चारही बाजूंनी टीका होते. कुठल्यातरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही पत्रकार याला खतपाणी घालत आहेत. जुन्या केसेस काढून नीलेश राणे व शिवसेना बदनाम झाली पाहिजे, असा त्यांचा डाव आहे. पण त्यांनी आमची कितीही बदनामी केली, तरी विरोधकांना पुढील 25 वर्षे परत संधी नाही. तुम्हाला मी लोकप्रतिनिधीच व्हायला देणार नाही, असा इशारा आ. राणे यांनी विरोधकांना दिला.
आ. राणे म्हणाले, आम्ही लोकांसाठी खस्ता खाल्या आहेत. कोणी सांगितले स्वभाव बदला, आम्ही तेही केले. कशासाठी तर माझ्या सिंधुदुर्गासाठी. या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला चांगले दिवस दाखवले. करायचे तर त्यांच्यासाठी करायचे आणि शेवटपर्यंत सिंधुदुर्गासाठीच करणार आहे. या नीलेश राणेला दहा वर्षांच्या वनवासातून कुणी मुक्त केले असेल, तर ते माझ्या सिंधुदुर्गवासीयांनी केले आहे. त्यांचे ऋण मी आजन्म फेडू शकणार नाही.
मी सरकारमध्ये कोणाला फोन करीत नाही. मी फक्त मंत्री उदय सामंत यांना मदतीसाठी फोन करतो. बाकी कुठेही जात नाही. त्यामुळे उदय सामंत यांनी असेच प्रेम सिंधुदुर्गवर ठेवावे. तुमच्याकडे एमआयडीसी विभाग आहे. त्यामुळे आज येथे मोठी घोषणा करावी, अशी मागणी आ. राणे यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पक्षासाठी रक्ताचे पाणी केले. या कार्यक्रमात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे योगदान फुकट जायला नको, त्यांच्या कामाची दखल, मंत्री सामंत यांनी श्री. शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवावी.
संजय पडते म्हणाले, सर्वसामान्यांचे आमदार नीलेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत ठाकरे सेनेचे कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. यात अनेक सरपंच, शाखाप्रमुख, विभागप्रमुखांचा समावेश आहे. यापुढेही मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहेत. आ. राणे यांच्या नेतृत्वात 10 मे नंतर गावागावांत पक्ष प्रवेश होणार आहेत.