कणकवली : कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई- सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी ‘फ्लाय-९१’ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मनोज चॅको यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. या सेवेच्या प्रारंभासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक सर्व सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी ‘फ्लाय-९१’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
तसेच गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अतिरिक्त उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. यामुळे कोकणवासीयांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होईल. याचा पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.