कणकवली : खा. विनोद तावडे यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडली. त्यांच्या कर्तृत्वाचा हा गौरव आहे. राष्ट्रहित आणि पक्षहित जोपासत पक्षाचे निष्ठेने काम करणार्या विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत. कार्यकर्त्यांनी टिकाकार न होता सेवक बनून जनतेसाठी काम करणे आवश्यक आहे असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
खा. विनोद तावडे यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना खा. नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील जनता वैचारीक दृष्ट्या प्रगल्भ व्हावी यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सत्कार हा गुणात्मक कार्याचा होतो. खा. विनोद तावडे यांनी याहीपेक्षा चांगले काम करावे त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा सत्कार आहे. विनोद तावडे आणि आपले पूर्वीपासूनच सलोख्याचे संबंध आहेत.पक्षाचे सरचिटणीस म्हणून ते उल्लेखनिय असे काम करत आहेत. जिल्ह्यातील एक विचाराच्या सर्व लोकप्रतिनिधिंनी एकत्र बसून महिन्यातून एकदा जिल्हा विकासाबाबत चर्चा करू अशी सूचना आपण त्यांना केली. तसे केल्यास जिल्ह्यातील कुठलेही विकासाचे काम राहणार नाही. कार्यकर्त्यानी चांगल्याला चांगले म्हणण्याची आवश्यकता आहे. तिकीट कोणालाही मिळूदे ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. बिहार नंतर पश्चिम बंगालची जबाबदारी आपल्या महाराष्ट्रातील नेत्याने यशस्वीपणे पार पाडली याचा आम्हाला अभिमान आहे.
पक्षासाठी विनोद तावडे यांच्यासारखे वाहून घेणे महत्वाचे आहे. आ. प्रमोद जठारांमध्येही काही खास गुण असतील म्हणून त्यांची विधान परीषदेवर निवड झाली. आता त्याचा प्रत्यय त्यांनी दाखवावा असेही राणे म्हणाले. आ. प्रमोद जठार म्हणाले, विनोद तावडे हे पक्षाची मॅनेजमेंट प्रचंड ताकदीने सांभाळणारे नेते आहेत. शिक्षणमंत्री असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. कोकणबद्दल ते संवेदनशिल आहेत. निष्ठावंतांचे महागूरू म्हणजे विनोद तावडे आहेत. एकदिवशी निश्चितपणे ते देशाचेही नेतृत्व करतील असा विश्वास आ. जठार यांनी केला. यावेळी अजित गोगटे, प्रभाकर सावंत, शैलेंद्र दळवी यांनीही खा. विनोद तावडे यांना शुभेच्छा दिल्या.