सिंधुदुर्ग : 1 मार्च 2026 हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. 40 वर्षांपूर्वी थांबलेली मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोट सेवा रविवारी पुन्हा एकदा सुरू होत आहे. शेकडो चाकरमानी रविवारी विजयदुर्ग बंदरावर उतरणार आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे या बोटीला मुंबईत शुभारंभाचा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान, पहिल्या फेरीत हाऊसफुल बुकिंग असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
मुंबई ते विजयदुर्ग अशी रो-पॅक्स प्रवासी फेरी रविवारी सकाळी 8 वा. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून सुरू होणार आहे. अवघ्या सहा तासांमध्ये म्हणजे दुपारी 2 वा. ही बोट विजयदुर्ग बंदरावर पोहोचणार आहे. या बोटीत पहिल्या फेरीमध्ये शेकडो प्रवासी या ऐतिहासिक जल फेरीचे साक्षीदार ठरणार आहेत. या प्रवाशांबरोबरच गाड्या आणि मोटारसायकलीसुद्धा असणार आहेत. विजयदुर्ग बंदरावर सर्व ती तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी बंदरे विकास खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर रो-रो सेवा सुरू करण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले होते.