Mumbai Goa NH 66 construction delay
कुडाळ : कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH 66) रेंगाळलेल्या कामाबाबत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात आवाज उठवला आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ सुरू असलेले हे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
NH 66 हा केवळ रस्ता नसून कोकण आणि गोव्याच्या पर्यटन, व्यापार आणि वाहतुकीचा मुख्य कणा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कृषी, मत्स्यव्यवसाय आणि लघु उद्योगांना मोठी चालना मिळेल,असे त्यांनी सभागृहात नमूद केले. दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या चौपदरीकरण प्रकल्पाला अनेक अडचणींनी ग्रासले आहे.
जमीन संपादनातील पेच: अनेक ठिकाणी भूसंपादनामुळे काम थांबले आहे. वनविभाग आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीमधील तांत्रिक अडचणी,काम सोडून गेलेले किंवा संथ गतीने काम करणारे कंत्राटदार,अपूर्ण पूल आणि बॉटलनेक्स, पुलांची कामे अर्धवट असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
दरम्यान, येत्या काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. अपूर्ण रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाल होतात आणि अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, अशी आग्रही मागणी खा. तानावडे यांनी करत सरकारला विनंती केली की, सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी एक 'डेडलाईन' निश्चित करावी. या महामार्गाच्या पूर्णत्वावर लाखो प्रवाशांचे आणि पर्यटकांचे भविष्य अवलंबून असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले.