सावंतवाडी ः आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत बोलताना शिवसेनेचे (शिंदे गट) माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. युती होण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न सुरू असून, युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
आ. केसरकर म्हणाले, युती होण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत आणि बोलणी अद्यापही सुरू आहेत. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत, पण नेमकी भूमिका वरिष्ठांनी जाहीर केलेली नाही. त्यामुळे चर्चा होईपर्यंत थांबणे चुकीचे ठरणार आहे. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वबळावर लढण्याच्या द़ृष्टीने सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मालवण येथील भाजप पदाधिकार्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, आ.केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. मालवणमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नाही, असे बोलणार्या भाजपच्या नेत्यांनी टोकाचे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, मालवण-कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत, त्यामुळे पदाधिकार्यांनी बोलताना तारतम्य पाळणे गरजेचे आहे. या भाजप नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांनी समज द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये अद्याप अधिकृत युती न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित केले असून, सर्व उमेदवार रविवार, 16 नोव्हेंबर रोजी जल्लोषी वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आ. केसरकर यांनी ही माहिती दिली. शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अॅड. निता सावंत-कविटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, दहा प्रभागांमधून वीस उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सावंतवाडी येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) तयारी पूर्ण केली असून, नगराध्यक्षपदासह सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, आयत्या वेळी महायुतीची युती झाल्यास काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागतील, तशी त्यांना कल्पना देण्यात आली असल्याचे आ. दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. युतीबद्दल बोलताना आमदार केसरकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सध्या शिवसेनेकडून नगरपालिकेसाठी सर्व उमेदवार देण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत युतीचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आयत्या वेळी तसा निर्णय झाल्यास, काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागतील, तशी त्यांना कल्पना देण्यात आली आहे, असे केसरकर यांनी नमूद केले.