रत्नागिरी : जाकीरहुसेन पिरजादे
कोकणकरांसाठी आणखीन एक खुशखबर असून ई-शिवाई, स्मार्ट बसेस, राजमाता जिजाऊ बसेसनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिनी बसेस मंजूर झाल्या आहेत. आता कोकणातील ग्रामीण भागात वाहतूक अधिक सक्षम होण्यासाठी तसेच दुर्गभ, डोंगराळ भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत एसटी बसेस जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ८५ लालपरी मिनी बसेस येणार आहेत. वाला दुजोरा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकण दौऱ्यात दिला आहे. मिनी बसेस आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामीण प्रवाशांना मोठा फायदाच होणार आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभरात स्मार्ट एसटी बसेस, राजमाता जिजाऊ बसेसचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता ज्या ठिकाणी आपली लाडकी लालपरी पोहचू शकत नाही, अशा डोंगराळ, दुर्गम भागात मिनी बस चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. अखेर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिनी बसेस देण्यात येणार आहेत. कोकणासह असे काही ठिकाण आहेत त्याठिकाणी लालपरी पोहोचू शकत नाही.
त्यामुळे प्रवाशांना मोठी पायपीट करून मुख्य रस्त्यावर यावे लागते. मोठे हाल, गैरसोय प्रवाशांची होत आहे. अशा डोंगराळ, दुर्गम भागात मिनी बस जाणार असून शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या प्रवाशांना मिनी बसमधून प्रवास करता येणार आहे. कोकणासह राज्यभरातील ग्रामीण भागातील दुर्गम भागात या बसेस धावणार आहेत.
रत्नागिरी आगारासाठी
आतापर्यंत १८ बसेस आल्या आहेत. आणखी बसेस येतील. मिनीबसेससाठी प्रस्ताव पाठवला आहे. किती मिनी बसेस मंजूर झाल्या आहेत, किती बसेस येणार याविषयी अद्याप तरी पत्रक आलेले नाही.
- आश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग