सावंतवाडी : वेंगुर्ला-बेळगाव महामार्गावरील प्रसिद्ध आंबोली घाटात आज दुपारी भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. काल अपघातग्रस्त झालेला एक ट्रक आज दुपारी घाटातून बाहेर काढण्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे घाटातील नागमोडी वळणांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली घाटात एका ट्रकचा अपघात झाला होता. हा अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी दुपारी प्रशासनाकडून क्रेनच्या साहाय्याने मोहीम हाती घेण्यात आली. ट्रक हटवताना सुरक्षेचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आली होती. मात्र, मुख्य महामार्ग असल्याने काही वेळातच दोन्ही बाजू महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली.
घाटातील कठीण वळणांवर गाड्या अडकल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना तासंतास ताटकळत राहावे लागले. उकाड्यामुळे आणि वाढत्या कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक यशस्विरित्या बाजूला केल्यानंतर आणि पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केल्यानंतर घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.