विरण : पुढारी वृत्तसेवा
जनतेच्या जीवितास घातक ठरलेले हिवाळे, ओवळीये, शिरवंडे परिसरातील क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी गुरुवारी झालेल्या चार गावांच्या ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामस्थांनी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याबाबत खनीकर्म विभाग तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे ग्रामस्थांच्या तक्रारीचा अहवाल सादर करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात हिवाळे येथील रवींद्र गावडे, बांदिवडे येथील मयुरेश राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी संयुक्त बैठक ज्ञानदीप विद्यालय हिवाळे येथे आयोजित केली. यावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मयुरेश राणे, रवींद्र गावडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मालवण तहसीलदार गणेश लव्हे, आरटीओ चे वरिष्ठ अधिकारी विनोद भोपळे, पराग मातोंडकर, प्रदूषण अधिकारी महाराष्ट्र संदीप कर्पे, आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, पी.डब्ल्यू.डी चे उप अभियंता (मालवण विभाग) अजित पाटील, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी जि प बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, शिरवंडे सरपंच चैताली घाडीगावकर, किर्लोस सरपंच श्रीमती मेस्त्री, पोलीस पाटील वीरेंद्र कदम, मंडळ अधिकारी संतोष गुरखे, व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या परिसरात मागील कित्येक वर्षे चालू असलेल्या क्रशर बाबत होणाऱ्या नुकसानी विषयी म्हणणे सादर केले.
हिवाळे, ओवळीये, शिरवंडे, किर्लोस मधील ग्रामस्थांनी यावेळी क्रशर पासून आपल्या गावात होणाऱ्या खोलवर सुरूंगस्फोट, ध्वनी प्रदूषण, शोषणाचे आजार, पर्यावरणाची हानी, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, नदीचे पाणी दूषित होणे तसेच क्रशरपासून होणाऱ्या विविध प्रकारच्या उपद्रवान बाबत आपले लेखी म्हणणे सादर केले. क्रशर व्यवसाय चालू करताना क्रशरमालकांनी वस्तीच्या अंतराचा निकष न राखता नियमबाह्यपणे व्यवसाय चालू केला असून क्रशर पासून उसळणारी धूळ या परिसरातील चार ते पाच किलोमीटर अंतरावर पसरते. त्यामुळे शेती बागायती करणे ग्रामस्थांना धोक्याचे झाले आहे.
मागील पंधरा वर्षे येथील ग्रामस्थ याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करत आहेत. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान नुकत्याच घडलेल्या डंपर अपघातात दोन तरुणांना नाहक जीव लागल्याने त्यांची कुटुंबे उध्वस्त झाले आहे. संतप्त ग्रामस्थांनी यापुढे या परिसरात क्रशर व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा अशी एक मुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
पी.डब्ल्यू. डी अधिकारी या मार्गावरील डंपर मुळे, झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ता साईड पट्टी सुद्धा पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या विभागाने या अपघातांची गंभीर दखल घेतली असून ओसरगाव ते हिवाळे फाटा या मार्गावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असून वापुढे या मार्गावर आरटीओचे गस्ती पथकही कार्यरत राहणार आहे.
क्रशर पासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत या भागाचा लवकरच सर्वे करून तसा अहवाल शासनाकडे सादर करू असे आश्वासन अधिकारी संदीप कर्पे यांनी दिले. एकंदरच पाहता किर्लोस शिरवंडे हिवाळे व ओवळीये येथील ग्रामस्थ क्रशर व्यवसाय या परिसरातून कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने शेवटी तहसीलदार यांनी हिवाळे परिसरातील शिरसाट व मोरजकर यांचे क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून उर्वरित क्रशर वावत ग्रामस्थांचे ठरावानुसार वरिष्ठांकडे अहवाल सादर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.