उदय बापर्डेकर
मालवण : शासनाचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै हा सुरु होत असून ६१ दिवस यांत्रिकी बोटी द्वारे होणारी मासेमारी बंद राहणार आहे.माशांच्या प्रजननासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी सागरी जलक्षेत्रात १ जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात येत आहे. ६१ दिवसांचा हा कालावधी माशांच्या प्रजननासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी हा मासेमारी बंदी कालावधी महत्वपूर्ण आहे.
मासेमारी बंदी कालावधी व पावसाळी कालावधीतील सुरक्षितता या दृष्टीने समुद्रातील मासेमारी नौका मच्छीमारानी किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणल्या आहेत. पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी सुरक्षित शाकरून ठेवण्याच्या कामाला मालवण किनारपट्टीवर मच्छमारांची लगबग दिसत आहे. बांबू, माडांची विणलेली झावळे व प्लास्टिक कापड, यांच्या साहाय्याने मासेमारी नौका सुरक्षित ठेवल्या जात आहेत. त्याच बरोबर मासेमारी जाळी, नागर, दोरखंड, छोट्या नौका, आदी साहित्य सुरक्षित ठेवले जात आहे.