कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि राज्य शासनमान्य सर्वोच्च उद्योग संघटनेच्या वतीने १५ व १६ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चेम्बर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी दिली. १५ ऑगस्ट रोजी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागाच्या कार्यालयाचे आणि इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन आणि १६ ऑगस्टला हॉटेल आराध्य येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि उद्योजक परिसंवाद होणार आहे.
कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, एमआयडीसी असो.चे अध्यक्ष मोहन होडावडेकर, गव्हर्नर कौन्सिल मेम्बर ॲड. नकुल पार्सेकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, ‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबा टोपले उपस्थित होते.
पेडणेकर म्हणाले, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आ. नीलेश राणे, दीपक केसरकर, प्रमोद जठार तसेच जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती या सर्व कार्यक्रमास लाभणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत MACCIA च्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, २०२६-२०२८ कार्यकाळातील नूतन व्यवस्थापन समिती, कार्यकारिणी व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांचा सत्कार, तसेच 'उद्योजक परिसंवाद' आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादामध्ये उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन, एमएसएमई, स्टार्टअप्स, निर्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कौशल्य विकास, गुंतवणूक, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. राज्यातील नामवंत उद्योगपती, वरिष्ठ शासकीय अधिकारी, बँकिंग व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी आणि यशस्वी उद्योजक या परिसंवादात सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
MACCIA चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील उद्योगपती, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला उद्योजिका, युवा उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रात रुची असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.