मालवण : बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करून जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी भिक्खू संघाने सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा 28 एप्रिल रोजी स.10 वा. काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी दिली.
मोर्चाची माहिती देताना श्री.कदम म्हणाले, बोधगया हे जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र असून बौद्ध धर्माच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे.जिथे भगवान गौतम बुद्धांना दु:खमुक्तीचे दिव्यज्ञान प्राप्त झाले. जगभरातील बौद्धांसाठी वंदनीय असणार्या या स्थळावर सध्या अन्य काही लोकांनी कब्जा केला आहे. भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीच्या विपरित अंधश्रद्धा फैलावणारे कर्मकांड तेथे केले जाते ही निषेधार्थ बाब आहे. बौद्ध धर्माची अनेक धार्मिक स्थळे, लेणी, विहारे या ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे बौद्ध संस्कृतीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
सन 1949 च्या बोधगया टेंपल कायद्यातील महाविहार व्यवस्थापन समिती रचनेतील अन्यायकारक तरतुदींमुळे महाबोधी महाविहार या बौद्धांच्या पवित्र स्थळावर बौद्धेत्तर लोकांनी कब्जा मिळवला आहे. त्यांच्या कब्ज्यातून मुक्त करून हे पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळावे ही मागणी घेवून अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम अंतर्गत सुमारे 100 बौद्ध भिक्षू बोधगया महाबोधी महाविहार येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि बुद्धिस्ट फेडरेशन च्या नेतृत्वाखाली या विराट मोर्चा चे आयोजन केले आहे. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्याधर कदम यांनी केले आहे. या मोर्चात बौद्ध धर्माच्या सर्वच धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संस्था सहभागी होणार आहेत.