वैभववाडी : तिथवली येथे कोंबडयांच्या पोल्ट्रीत घुसलेल्या बिबट्याला वनविभागाने मोठया शिताफीने पिंजर्यात जेरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास घडली.वन विभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
गेले काही दिवस तिथवली -कोळपे परिसरात या बिबट्यांचा हैदोस सुरू होता. या बिबट्यांने परिसरातील अनेक शेळ्या,कोंबड्या,पाळीव कुत्रे फस्त केले होते. या परिसरात दिवसाढवळ्या ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. अगदी घरा शेजारी येऊन बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. आठ दिवसापूर्वी तिथवली येथील एका शेतकर्याच्या फार्म हाऊस येथे असलेल्या चार शेळ्या, तर अनेक कोंबड्या फस्त केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी पोल्ट्री मालक नेहमी प्रमाणे पोल्ट्रीत गेले असता त्यांना पोल्ट्रीत बिबट्या घुसलेला दिसला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने याठिकाणी तातडीने येऊन बिबट्याला मोठया शिताफिने पिंजर्यात जेरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वन विभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
तिथवली कोळपे परिसरात बिबटयाच्या मुक्त संचार सुरु असून बिबट्याने आपला मोर्चा थेट मानवी वस्तीत वळवला आहे.बिबटा घरातील पाळीव कुत्री, मांजरे, कोंबड्या फस्त करीत आहे. काही दिवसापूर्वी कोळपे येथील शेतकर्याचे गोठ्यात बांधलेले वासरू बिबट्याने ठार मारले होते. बिबट्याने मानवीवस्तीकडे मोर्चा वळवल्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. वस्तीत बिबट्या येत असल्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाला असून वन विभागाने यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.