कुडाळ : पश्चिम बंगाल राज्यात तत्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे. तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास विद्यमान शासन असमर्थ असल्याने यासंदर्भात केंद्र शासनाने विशेष लक्ष घालून हिंदूंना तत्काळ संरक्षण पुरवावे, अशी मागणी कुडाळमधील सकल हिंदू समाजाने केली. याबाबत राष्ट्रपतींना पाठविण्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले.
सकल हिंदू समाजाने गुरुवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. रमाकांत नाईक, विवेक पंडित, काशीराम निकम, राणे काका, बागवे काका, पंदारे काका, वैभव पाटील, ओंकार मंडोलकर, ओमकार परब,राजू साळगावकर, दैवेश रेडकर आदींसह हिंदू बांधव उपस्थित होते.
तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आणि अस्थिर झाली आहे. या राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे. ‘वक्फ’ कायद्या विरोधात होणारे आंदोलन आता हिंसक बनत आहे. या आंदोलना निमित्त हिंदू समाजावर होणारे अत्याचार हे केवळ सामाजिक नाहीत तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हे प्रकार रोखण्यात पूर्ण अपयशी ठरत आहेत. यामुळे सामान्य हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांच्या जीवित व मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी पश्चिम बंगाल राज्यात तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, अशी मागणी या निवेदनातून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.
या दंगलीत सहभागी असणार्यांवर संघटित गुन्हेगारी कृत्य, तसेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवावेत तसेच हिंदूंच्या हत्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावीत आणि जलदगती न्यायालये स्थापन करून दोषींना तत्काळ फाशी द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्याची माहिती सकल हिंदू समाजातर्फे रमाकांत नाईक यांनी दिली.