सचिन राणे
Konkan train car service 2025 update
नांदगाव: गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेने 'कार ऑन ट्रेन' ही नवी सेवा सुरू केली आहे, मात्र या सेवेचा थांबा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नसल्याने कोकणवासीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला सुसज्ज रो-रो टर्मिनल गेली १२ वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहे. जर हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता, तर आज हजारो चाकरमान्यांना त्याचा थेट लाभ घेता आला असता.
कोकण रेल्वेने २३ ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोवा राज्यातील वेर्णा दरम्यान 'कार ऑन ट्रेन' सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना आपली कार रेल्वेने घेऊन जाता येणार आहे. मात्र, या मार्गावर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही पिकअप पॉईंट नसल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. तास अन् तास वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा हा एक उत्तम पर्याय असूनही, तो कोकणवासीयांसाठी निरुपयोगी ठरत आहे.
कोकण रेल्वेने २०१४ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने नांदगाव येथे रो-रो टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती. या टर्मिनलमुळे मंगळूर ते कोलाड दरम्यान ट्रक वाहतुकीला मोठी चालना मिळणार होती, ज्यामुळे सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील वाहतूकदारांना फायदा होणार होता. सुमारे ५० ट्रक हाताळण्याची क्षमता असलेले टर्मिनल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. रॅम्प, वजन काटा, लाईटिंग आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या.
कोल्हापूर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांवर तोडगा न निघाल्याने हा प्रकल्प थंड बस्त्यात गेला. आज तब्बल १२ वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्णपणे दुर्लक्षित आहे. येथील सर्व सुविधा गवत आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकल्या असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया गेली आहे.
नांदगाव रो-रो टर्मिनल हे सिंधुदुर्गातील रखडलेल्या प्रकल्पांचे एकमेव उदाहरण नाही. मालवणचा सी-वर्ल्ड, आनंदवाडी प्रकल्प, विजयदुर्ग बंदराचा विकास, दोडामार्ग एमआयडीसी यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या केवळ घोषणा झाल्या, पण त्यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर आहे.
आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'कार ऑन ट्रेन' सेवा सुरू झाली असताना, नांदगाव टर्मिनल कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वे प्रशासनाकडे या विषयाचा पाठपुरावा करून हा टर्मिनल सुरू केल्यास हजारो चाकरमान्यांना आणि व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानेही सकारात्मक पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
नांदगाव रेल्वे स्टेशनजवळच सिंधुदुर्ग मार्केट यार्डचे काम सुरू आहे. हे मार्केट यार्ड पूर्ण झाल्यावर येथील शेतमाल आणि इतर उत्पादने देशाच्या इतर भागांत पोहोचवण्यासाठी रो-रो सेवा अत्यंत महत्त्वाची ठरेल. विजयदुर्ग बंदर, आनंदवाडी प्रकल्प आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासोबतच रेल्वेची रो-रो सेवा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती देऊ शकते.