कणकवली : माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व सार्व. बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करत मुख्यमंत्री व इतर नेत्यांची ये-जा असणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजविले. गेले अनेक महिने हे खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत होते. मात्र हे खड्डे अगदी तातडीने आणि ते ही डांबराने बुजविण्यात आल्याने मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या कणकवली दौऱ्याचे हे फलितच म्हणावे लागेल.
महामार्ग असो अथवा राज्य वा जिल्हा मार्ग खड्ड्यांची मालिका सुरुच असते. विशेषतः पावसाळ्यात पडणारे हे खड्डे पुढचा पावसाळा येईपर्यंत केव्हा बुजविले जातील याची हमी नसते. अनेकवेळा लोक प्रतिनीधी अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विभागांकडून निधीची उपलब्धता, प्रशासकीय मंजूरी अशी कारणे दिली जातात. त्यामुळे वाहनचालकांना अशा खड्ड्यांमधुनच ये-जा करावी लागते. ग्रामीण रस्त्यांची अवस्था यापेक्षाही वेगळी नाही. खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागाने हाती घेतल्यानंतर अनेक खड्डे हे जैसे थे च राहतात. कदाचित ते नजर चूकीने राहिले असतील असे समजून वाहन चालकही प्राप्त परिस्थितीतून मार्गक्रमण करत असतात.
मंत्र्यांच्या दाैऱ्यानिमित्ताने का होईना...
कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हिस रोडवरील खड्डे महामार्ग प्राधिकरणकडून बुजविण्यात आले होते. मात्र श्रीधर नाईक चौकात उड्डाणपुलाच्या खाली असलेला खड्डा तसाच होता. हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या कणकवली दौऱ्याच्या काही तास अगोदर हा खड्डा तातडीने बुजविण्यात आला. तर नरडवे रोड मार्गावरील मुडेश्वर मैदानपर्यंतच्या भागातील खड्डे ही असेच तातडीने बुजविण्यात आले. या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना संबंधित विभागाने हे खड्डे बुजविल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.