कणकवली : केंद्र सरकारने काढलेल्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने बुधवारी 9 जुलै रोजी भारत बंद ची घोषणा केली होती. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळू मेस्त्री, राजू राठोड, धीरज मेस्त्री व पदाधिकार्यांनी महाराष्ट्र बँक कर्मचार्यांच्या आंदोलनाला भेट देत आंदोलनात सहभागी झाले.
बँकिंग सेवा, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस, सरकारी बस, सरकारी कारखाने, कंपन्याचे उत्पादन या सर्व कामगारांनी भारत बंदची घोषणा करून आंदोलन करत सरकारने खासगीकरण थांबवावे व कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. बँक कर्मचार्यांनी कामगार एक जुटीचा विजय असो, आवाज दो हम एक है, कामगार कायद्यामधील बदल रद्द करा-रद्द करा, बँक कर्मचार्यांची सुरक्षा वाढलीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
केंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत तर या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार या भारत बंदमध्ये रस्त्यावर उतरणार आहेत.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व कामगार संघटनेच्या पाठीशी आहे. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणं आखली जात असून त्यामुळे कामगार, शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी नाईक यांनी केला.