सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या वाटपात गैरव्यवहार आणि भ्रष्ट कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी केला आहे. या प्रशासकीय अनास्थेविरोधात आणि भ्रष्टाचाराच्या कारभाराविरोधात येत्या १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
श्रेयस मुंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी नगर परिषदेने शासनाची रीतसर मंजुरी न घेता तसेच कोणतीही पारदर्शक लिलाव पद्धत न वापरता, एकाच व्यक्तीकडे मागील २५ वर्षांपासून ९ पेक्षा अधिक गाळे ठेवू दिले आहेत. एवढेच नव्हे तर, नियमांचे उल्लंघन करून हे गाळे परस्पर पोटभाड्याने देऊन मोठ्या प्रमाणात अर्थार्जन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंज यांनी जिल्हाधिकारी, सावंतवाडी नगर परिषद आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निवेदन सादर केले आहे. या संकुलातील गाळ्यांसाठी स्वतः दरमहा ३० हजार रुपये भाडे देण्यास तयार असतानाही, नगर परिषद प्रशासन केवळ १२०० रुपयांची नाममात्र भाडेवाढ करून पुन्हा कोणताही लिलाव न घेता मूळ भाडेकरूंनाच गाळे बहाल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उपोषणस्थळी नगर परिषदेच्या गैरकारभाराचे पुरावे म्हणून व्हिडिओ आणि फोटो मोठ्या स्क्रीनवर दाखवले जातील. यावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी; अन्यथा निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा थेट इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.