नांदगाव : जिल्ह्याचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे तो काजू हंगाम सुरु झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातून कलमी व पारंपरिक काजू बीची बाजारात आवक सुरू झाली आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने जिल्हयातील मुख्य असलेल्या तळेरे आठवडी बाजारात काजू बीला खरेदीदारांकडून १५० ते १६० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने उत्पादकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान काजू दर निश्चित केलेले नसल्याने हा भाव कायम राहण्यासाठी शासन स्तरावर काजूला हमीभाव घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांकडून केला जात आहे. त्याचबरोबर इतरही कोकणातील गावठी मेवा बाजारात आला असून त्यालाही नागरीकांची पसंती दिसून येत असल्याने या हंगामी उत्पादनामुळे रोजगार निर्मिती होत आहे.
यंदा बदलत्या हवामानाचा परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. मात्र काजू बीच्या आधी बागायतदार व काही शेतकरी काजूचे ओले गर विक्रीसाठी बाजारात दाखल करत होते . या गरांना खरेदीदारांकडून सुरवातीला १०० काजू गरांना ५०० ते ६०० व सध्या ३०० ते २५० रुपये इतकाच भाव दिला जात आहे. मात्र पिकलेल्या काजूबीला प्रतिकिलो सुरवातीलाच १६० रुपये याप्रमाणे दर दिला जात आहे. यामुळे यापुढे एकंदरीत स्थिती पाहता यंदाही हा दर १२५ ते १३० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे पुढे राहण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मार्च ते मे असे तीन महिने काजूचा व्यापार चालतो. यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने याचा परिणाम काजू पीकावर होणार आहे. सध्या काजूची काजू कलमांच्या काजूची आवक मोठया प्रमाणात होत असल्याने यापुढेही मे पर्यंत अशीच वाढणार आहे. तर गावठी काजू मार्च महिन्यात शिमगोत्सवानंतरच्या काळात तयार होऊन बाजारात येत असतात. कारण त्या काळात उष्णता वाढत असते. थंडी लांबल्याने त्यांचीही तयार होण्याची प्रक्रिया लांबणार आहे. मात्र गेली अनेकवर्षे काजू बागात राबूनही उत्पादकांना दर मिळत नाही. जिल्ह्यात ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात काजू पीक घेतले जाते. अनेक लोकांची उपजीविका या पिकावर अवलंबून असते. बाजारपेठेत काजू अत्यंत महाग दराने विकले जातात. पण उत्पादकाला योग्य दर दिला जात नाही.
प्रक्रिया केलेले काजूगर दुकानांवर ८०० ते १ हजार रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात आहेत. पण, शेतकऱ्यांचा कच्च्या काजूगरांना केवळ १२० ते १३० रुपयांपर्यंत भाव दिला जातो. काजू पिकासाठी वर्षभर मशागत करावी लागते. पण, हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी उत्पादकांमध्ये नाराजी आहे. मात्र यंदा सुरवातीलाच १६० रुपयांचा दर मिळाल्याने हा दर शेवटपर्यंत असाच राहावा असे काजू उत्पादकांसह शेतक-यांना वाटत आहे. केंद्र सरकारच्या काजू आयात धोरणाचा कोकणातील काजू उत्पादक बागायतदारांना फटका बसत आहे. बाहेरच्या देशातील काजू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने, कोकणातील काजूबागायतदारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील काजू पिकाला शासनाने हमी भाव द्यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच आंबाही मार्केटसाठी रवाना होत असून ही आवक गुढी पाडव्यानंतर मोठया प्रमाणात होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसह सातही तालुक्यातील मुख्य बाजारपेठात सध्या आंबा,काजूसह अन्य कोकणी मेवाही बजारात आला असून यामध्ये ओले काजूगर १०० गर ३०० ते ३५०,हिरव्या काजू ५० नग १००,रायवळ हिरवे आंबे १०० रु डझन,गावठी वांगी ५० रु. ३ नग,गावठी वाल पेंढी २० रु.,कैरी २० ला एक नग ५० ला तीन,शेवग्याच्या शेंगा २० रु ४ नग,गावठी कलिंगण ५० रु. हिरवी करवंद २५,५० रु वाटा,फणसाचे गरे ५० ते १०० रु वाटा, चिनी ,कणगी, चुरण,भांजी, गावठी चिकु,पेरुही बाजारात आवक हात असून ही आवक मे महिन्यापर्यंत अशीच चालणार असून यासाठी पारंपारीक गावठी विक्रेते हंगामी मेवा बाजारात उपलब्ध करुन देणार आहे.