कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना ना. रवींद्र चव्हाण. सोबत नीलेश राणे, प्रभाकर सावंत, अजित गोगटे, राजन तेली आदी. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील तीनही विधानसभा भाजप लढणार : ना. चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाचे काम चतुर्थीपूर्वी होणार

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर आम्ही दावा करणार असून, महायुतीमधील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कणकवली मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे; पण कुडाळ मतदारसंघावरील दावा आम्ही सोडणार नाही. सावंतवाडी मतदारसंघातील वादावर लवकरच तोडगा काढू, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे चाकरमान्यांना त्रास होत आहे. या रस्त्याची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. आता उर्वरित कामे गणेश चतुर्थीपूर्वी केली जाणार असल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे भाजपची जिल्हा कार्यकारणी सभा शुक्रवारी झाली. सभेनंतर ना.चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे, माजी आ. अजित गोगटे, राजन तेली, जिल्हा चिटणीस रणजीत देसाई, संजू परब, राजन म्हापसेकर उपस्थित होते.

ना.चव्हाण म्हणाले, महायुतीमधील शिंदे गट शिवसेनेने विधानसभा मतदारसंघावर जो दावा केला त्यात गैर काही नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असतात पण महायुती म्हणून जेव्हा वरिष्ठ नेते एकत्र येणार त्यावेळी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. सध्या आम्ही जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा आमचाच असेल यात वाद नाही.तसेच सावंतवाडी मतदारसंघातील अंतर्गत वाद आहेत ते आम्ही मिटवू. सध्या आमचे संघटनात्मक काम सुरू झाले आहे. 11ऑगस्ट पर्यंत जिल्हास्तरीय अधिवेशन होणार असून त्यानंतर मंडळनिहाय बूथ शक्ती केंद्र अशा ठिकाणी अधिवेशन होणार आहे. महायुती म्हणून तिन्ही जागा जिंकण्याचा आम्ही संकल्प केला आहे.आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे 11,12, 13 ऑगस्ट रोजी विविध विभागातील लोकांच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी ‘लोकशाही दिन’ घेण्यात येणार आहे. तसेच गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारअसून त्या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले.

रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे टप्प्याटप्याने उद्घाटन

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साडेसहा हजार कोटी रूपयाचा निधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिला असून ती कामे सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण विमानतळाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. ज्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली त्या रेल्वे स्थानकाच्या कामाचे उद्घाटन क्रांतीदिनी 8 ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ना.चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT