सावंतवाडी : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली गावातील विजेची समस्या दूर करण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आंबोली गावठणवाडी येथे नवीन १०० केव्ही क्षमतेचा रोहित्रा (ट्रान्सफॉर्मर) बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवून या कामाला गती देण्याची विनंती केली आहे. आंबोली गणाचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी आ.र केसरकर यांच्याकडे मागणी केली होती.
पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना फटका
आंबोली पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असून दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेटी देतात. मात्र, सध्या या गावात होणारा वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने (Low Voltage) होत आहे. याचा मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागत आहे. तसेच, स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांवरही या विस्कळीत वीज पुरवठ्याचा विपरीत परिणाम होत असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
या समस्येकडे आ. दीपक केसरकर यांचे मायकल डिसोझा यांनी लक्ष वेधले होते. यानंतर आ. दीपक केसरकर यांनी आंबोली गावठणवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी १० लाख रुपयांची तरतूद करणे. संबंधित विभागामार्फत तत्काळ सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करणे. जिल्हा नियोजन समितीमधून तातडीने निधी उपलब्ध करून काम पूर्ण करणेसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. आंबोलीतील वाढते पर्यटन आणि स्थानिकांची गरज लक्षात घेता, हा ट्रान्सफॉर्मर बसवल्यास या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास मायकल डिसोझा यांनी व्यक्त केला आहे.