कुडाळ : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये 34 हेक्टर जमीन गायब झालेली आहे, ती जमीन शोधण्याचे काम सुरू आहे, उद्योजकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही उद्योजकांचे प्लॉट रद्द केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या शंका दूर केल्या. आडाळी एमआयडीसीतील ज्या उद्योगांना जमीन मिळाली आहे, त्या प्लॉटच्या ताब्यासंदर्भात निर्णय आधीच घेण्यात आला असल्याचे ना. सामंत म्हणाले.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. सामंत म्हणाले, आठ दिवसांत मी स्वतः आडाळी एमआयडीसीला भेट देणार आहे. या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे आणि हरवलेली जमीन शोधून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जमिनीचे खरेदीखतसुद्धा झाले असल्याचे सांगितले.
ना.सामंत म्हणाले की,आडाळी एमआयडीसी परिसरात ‘गोल्फ प्रकल्प’ ही फक्त पर्यटनाशी निगडित संकल्पना आहे. स्थानिक लोकांना तो प्रकल्प नको असल्यास तो रद्द केला जाईल. याबाबत मी स्वतः आडाळी सरपंचांशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले ‘संघर्ष नको, आम्हाला समजावून सांगा, प्रेझेंटेशन द्या, आम्ही तयार होऊ असे सांगितले आहे.आडाळी एमआयडीसीत कोणतेही उद्योग अडवले गेले नाहीत. सरकारचा हेतू केवळ उद्योग आणि रोजगार वाढविण्याचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांमध्ये राज्यात आदर्श ठरेल, यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे ना. सामंत यांना सांगितले.