रत्नागिरी : परतीचा पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जोरदार दणका दिला. विजांच्या लखलखाटांसह जोरदार वाऱ्याबरोबर या पावसाला अवकाळी पावसाचाही जोर होता. ढगांच्या गडगडाटात आलेल्या पावसाने रत्नगिरी रेल्वेस्थानकाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या छपराचे पीओपी पुन्हा निखळले. त्यामुळे प्रवाशांबरोबरच या छताखाली असलेल्या रिक्षा चालकांतही खळबळ निर्माण झाली.
गेले दोन दिवस कोकण किनारपट्टी भागासह अवकाळी पावसाचा लागलेला ससेमिरा काहीअंशी ओसरला होता. बुधवारी सकाळपसानूच पावसाने उघडीपही देत कोरडे वातावरण तयार झाले होते. पावसाचा जोर ओसरल्याने आता खरीप लागवड क्षेत्रात कापणीच्या कामांचा मार्ग मोकळा झाल्याचा निःश्वास शेतकऱ्यांत होता. मात्र, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचा जोर जोरदार वाऱ्याने वाढल्याने परतीचा दणका बसला. अनेक भागात उभ्या असलेल्या भात पिकालाही दणका दिला. काही भागात भात पीक आडवेही झाले आहे. सर्वाधिक पावसाचा जोर दापोली, खेड, चिपळूण आणि लांजा तालुक्यात होता. त्यामुळे या भागात खरीप लागवड क्षेत्रात उभ्या भात पिकाला धोका संभावण्याची शक्यता आहे.
दुपारी आलेल्या पावसाने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथेही नव्याने उभारण्यात आलेल्या छताला या पावसाचा दणका बसला. अलीकडेच या छताच्या आणि सुशोभीकरण कामांचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनापूर्वीही दोन दिवसआधी आलेल्या पावसानेही या छपराचे पीओपी निखळले होते तर अनेक भागात गळती लागली होती. बुधवारी झालेल्या पावसानेही या छताचे पीओपी खाली निखळले तर अनेक भागांत गळतीही लागली होती. त्यामुळे प्रवासीही घाबरले.
दरम्यान, बुधवारी २४ तासांत जिल्ह्यात ३२.७ मि.मी. च्या सरासरीने २८८ मि.मी एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंगळवारी रात्री खेड दापोलीसह खेड आणि चिपळुणात जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे या तीन तालुक्यात उभ्या राहिलेल्या भाात पिकाला धोका संभवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातही जोरदार अवकाळीने काही भगात भात पीक आडवे केले हाते. बुधवारी मंडणगड १८ मि.मी. दापोली ३६, खेड ६०, गुहागर २६, चिपळूण ५५, संगमेश्वर ३१, रत्नागिरी ३१.१०, लांजा २२.७० आणि राजापूर तालुक्यात २६.९० मि. मी. पावसाची नोंद झाली.