रत्नागिरी : ग्रामीण भागातील गोरगरीब जनता रुग्णालयात जाण्यासाठी पैसे नसल्याने आजार अंगावर काढल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळेच गोरगरीब जनतेला सुद़ृढ करण्यासाठी मोफत उपचार, शस्त्रक्रिया देणारे हॉस्पिटल असावे, अशी मनोमन इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साहाय्याने ती रत्नागिरीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूपाने पूर्ण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता आजार अंगावर काढण्याची वेळ येणार नसल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.
रत्नागिरी न.प.च्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे रविवारी लोकार्पण झाले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना पालकमंत्र्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत होते. गोरगरीबांच्या कल्याणकारी योजनेची पूर्तता ही पालकमंत्र्यांच्या स्वप्नातला प्रकल्प होता. तो पूर्ण झाल्यानंतर समाजाने आतापर्यंत दिलेल्या प्रेमाची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल समर्पीत करताना पालकमंत्र्यांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव दिसून आले. गरीब जनतेला न्याय देणार्या हॉस्पिटलची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, हे लक्षात ठेवूनच या हॉस्पिटलची निर्मिती झाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्याधिकारी तुषार बाबर, अभियंता यतिराज जाधव यांच्यासह अनेक अधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अधिकार्यांनी तातडीने अपेक्षीत कार्यवाही केल्यानेच हे हॉस्पिटल आता लोकसेवत रुजू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी यापूर्वी शेकडो विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने केली आहेत. पूर्वीच्या विकासकामांच्या सोहळ्यावेळी जेवढा आनंद झाला त्यापेक्षा अधिक समाधान हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दिसून आले. त्यामुळे पालकमंत्र्यांचे भाषण आवेशपूर्ण झाले. त्यातूनच त्यांनी अडीच वर्षापूर्वी झालेल्या सत्ता बदलाच्या गुवाहटी दौर्याच्या आणि लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. बालपणाबद्दल आठवण सांगताना ते म्हणाले की, आपण डॉक्टर व्हावे, अशी आई वडिलांची इच्छा होती. मी हुशार असल्याने आई वडिलांनी 12 वी चे गुणपत्रक पाहिल्यानंतर त्यांना मी डॉक्टर झाल्यासारखे वाटले, अशी गमतीशीर आठवण सांगत पालकमंत्र्यांनी यापुढे डॉक्टर होण्याच्या फंदातच पडलो नाही, असे सांगितले. माझ्याकडून जी काही विकासकामे झाली आहेत, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाटा मोलाचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असेही नम्रपणे सांगितले.
राजकीय नेत्यांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यात आपल्या या मल्टी स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटलची निर्मिती केल्याची नोंद माझया नावे होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, साधना फाऊंडेशन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. समिधा गोरे, प्रकल्प संचालक डॉ. रवींद्र परदेशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्यासह स्थानिक डॉक्टर, साहित्यिक उपस्थि होते.