चिपळूण शहर : लोटे औद्यागिक वसाहतीत पीफास सारख्या घातक रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीला बॅन केल्याशिवाय पालकमंत्री म्हणून गप्प बसणार नाही. मात्र कोकणातील तरूणांना घराजवळच रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या पाहिजेत. पर्यावरण, निसर्ग व कोकणला पूरक असतील अशा प्रकल्पांचे स्वागत कोकणातील जनतेने करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्र या, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
तालुक्यातील पोसरे येथील श्री देवी नवलाई वाघाजाई, श्री देव खेम, लखोबा देवस्थान मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभात ते बोलत होते. ना. सामंत पुढे म्हणाले, पालकमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची जबाबदारी माझी आहे. एखादे गाव अध्यात्मिक वारसा पुढे येण्यासाठी एकत्र येते त्याच्या पाठीशी आपण उभे राहू. पालकमंत्री म्हणून शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांना निधी खर्च करण्याची जबाबदारी आपली आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्यातून मला माझे भले करायचे नाही. हा पैसा जनतेच्या विकासकामांसाठी खर्च करायचा आहे.
पोसरे गावातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. आता हे गाव माझे आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. अनेकांनी सांगितले असेल की, पैसे मंजूर होणार नाहीत. मात्र मी आलोच आहे तो सर्व कामांसाठी निधी मंजूर करणार आहे, हे आज मंदिरासमोर सांगतो. मंदिराला संरक्षक भिंतीसाठी 12 लाख दिले. तसेच उर्वरित विकासकामांना रक्कम देण्याची जबाबदारी आपली आहे. व्यायामशाळा, विंधन विहीर, सुशोभीकरण आदी सार्वजनिक कामासाठी निधी मागितला आहे. पालकमंत्र्यांची जबाबदारी ही सार्वजनिक, सामाजिक कामे करणे असते. अशा विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुम्ही सांगितलेली कामे एक वर्षात पूर्ण करू. पुढच्या पंधरा दिवसांत विंधन विहीर करण्याचे काम सुरू करावे असे आपण तहसीलदारांना आदेश देत आहे. तुम्ही जे आशीर्वाद दिलेत, माझ्या पाठीशी राहिलात तसेच भविष्यात राहा, असे आवाहन ना. सामंत यांनी केले. यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त व मानकरी उपस्थित होते.