रत्नागिरी : स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आकस्मिक मृत्यू हा धक्कादायक आहे. मात्र, रोहित पवारांनी अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर भाष्य करण्याएवढा मी तज्ज्ञ नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अजितदादा पवार यांच्या जागी पदभार स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या अजितदादांचा वारसा नक्कीच पुढे नेतील, असा विश्वासही ना. सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोकणासाठी काय पाहिजे हे यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत आम्ही सांगणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ना. सामंत म्हणाले, ज्यांना खरी माहिती आहे त्यांनी ती तपास यंत्रणांना द्यावी. आ. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, मी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नाही, त्यामुळे त्यावर माहिती न घेता बोलणे योग्य नाही. अजितदादांचा विषय प्रचंड संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत आपल्याला माहिती नाही. जे त्याबाबत बोलले असतील ते पुरावे सादर करतील असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव ठाकरेंनी मान्य करावा हेच त्याला उत्तर असेल, असेही ते म्हणाले.