रत्नागिरी : तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपण १५ दिवसांपूर्वीच २ कोटी ४६ लाख रुपये मंजूर केले आहेत, परंतु ते मंजूर व्हावे म्हणून काही लोक आंदोलनाचे नाटक करत असल्याचे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेवर निघणाऱ्या एका कथित मोर्चाचा समाचार घेतला.
सोशल मीडियावर रील्स टाकून खोटा संभ्रम पसरवणाऱ्यांना प्रसिद्धी देणे थांबवले पाहिजे. अशा खोट्या प्रचाराला प्रशासनाने तात्काळ खुलासा करून चोख उत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले. पंधरा दिवसापूर्वी एका प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी दिला आहे, याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी संबंधितांना देणेही गरजेचे आहे. लोकांच्या मनातील शंका दूर करणे, हे अधिकार्यांचेही काम असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. बुधवारी निघणारा हा मोर्चा अखेर रद्द करण्याची वेळ संबंधितांवर आली. शिवसेना पदाधिकार्यांनीही लोकांची दिशाभूल करणे आता थांबवले पाहिजे, अशा भावना खंडाळा येथील शिवसेना विभागप्रमुखांनी व्यक्त केल्या.
पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षकांचे टोचले कान
पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावताना सांगितले, जे लोक सरकार आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करतात, खोट्या मागण्यांसाठी मोर्चे काढतात, त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक क्रिकेट खेळायला आणि चहा प्यायला जातात, हा संदेश प्रशासनात चांगला जात नाही. दीड वर्षांपूर्वीच मी याबाबत सांगितले होते. प्रशासनाविरुद्ध काम करणाऱ्यांकडे क्रिकेट खेळायला जाताना पोलीस अधीक्षकांनी आता जपून गेले पाहिजे, अशी माझी पालकमंत्री म्हणून स्पष्ट विनंती असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.