Illegal Cattle Transport  Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : कत्तलीच्या उद्देशाने बैलांची वाहतूक; तिघांवर गुन्हा

अलोरे-शिरगाव मार्गावरील प्रकार; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन बैलांसह बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास शिरगावहून अलोरेकडे जाणार्‍या मार्गावर कुंभार्ली गावाच्या अलिकडे असलेल्या नदीच्या पुलावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित वाहनाची तपासणी केली असता, बोलेरो पिकअप (एमएच ५० एन ५४७८) या वाहनाच्या मागील हौद्यात तीन बैल दाटीवाटीने व आखूड दोरीने बांधून ठेवलेले आढळून आले. या बैलांना वेदना व यातना होतील, याची कल्पना असूनही त्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच ही गुरे कत्तलीसाठी किंवा कत्तलीच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी अजय सुरेश साळुंखे (२७), आकाश प्रकाश साळुंखे (२९) आणि किरण सुरेश साळुंखे (२५) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही मूळचे बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील असून सध्या देवरुख येथे वास्तव्यास असल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT