रत्नागिरी : शहरातील उनाड गुरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असताना शुक्रवारी मारुती आळीमध्ये धक्कादायक प्रकार घडला. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेला पाठीमागून धावत आलेल्या गुरांनी जोरदार धडक दिली. धडकेने महिला रस्त्यावर कोसळल्यानंतरही गुरे थांबली नाहीत; उलट तिच्या अंगावरून पाय देत पुढे धावली. या घटनेत महिला जखमी झाली. त्यामुळे शहरातील उनाड गुरांचा प्रश्न केवळ वाहतुकीचा राहिला नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे.
गणेशोत्सवामुळे शहरातील बाजारपेठा आणि रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ वाढलेली असतानाच उनाड गुरे मोकाटपणे रस्त्यांवर फिरत आहेत. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणे, अचानक धावत येणे, वाहनांच्या आडवे जाणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. मारुती आळीतील घटनेने या समस्येची तीव्रता पुन्हा समोर आली आहे. गुरांच्या धडकेने महिला खाली पडल्यानंतर तिच्या अंगावरूनच गुरे धावत गेल्याने प्रसंग अधिक गंभीर झाला. वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेनंतर नगर परिषदेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी
दरम्यान, उनाड गुरांसह मोकाट कुत्र्यांचाही तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वंचित बहुजन विकास आघाडीने केली आहे. तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी बेहेरे यांना निवेदन दिले. नागरिक जखमी झाल्यानंतरही ठोस कारवाईची प्रतीक्षा कशासाठी, असा सवाल उपस्थित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरही केवळ संस्था शोधण्याच्या प्रक्रियेत पालिका किती काळ राहणार? एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
उनाड गुरे पकडून त्यांची देखभाल करण्यासाठी संस्था शोधण्याचे काम नगर परिषदेकडून सुरू आहे. काही संस्थांशी चर्चाही झाली आहे. मात्र, आर्थिक गणितामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पालिकेची प्रक्रिया सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र रस्त्यावरच पडला आहे.