रत्नागिरी : सागरी मासेमारी सुरू झालेली नाही. त्याचवेळी श्रावण चार दिवसांवर आल्याने रविवारी मासळीचे दर फारच वाढलेले होते. बुधवारी मांसाहार करण्याचा श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा दिवस असल्याने मासळीसाठी रविवारी मासळी बाजारांमध्ये गर्दी होती. मासळीचे दर वाढलेले असले तरी पुढील सव्वा महिना उपवास असल्याने खवय्यांनी दराकडे पाहिलेच नाही. आतापर्यंत ३०० रुपयांच्या वर दर गेलेला नसलेला सौंदाळा माशाचा किलोचा दर ५०० रुपये इतका होता. मध्यम आकाराच्या सरंगा ७५० रुपये तर शतकं आणि ताऊजचा किलोचा दर ७०० रुपये इतका होता. पापलेटचे तर बाजारामध्ये दर्शनच झाले नाही.
पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत आहे. त्याचबरोबर पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू केली जात असली तरी प्रत्यक्षात नियमित पर्ससीन नेट मासेमारी दरवर्षी १० सप्टेंबरपासूनच सुरू होते. श्रावण येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे १२ तारखेचा बुधवार श्रावणी उपवास सुरू होण्यापूर्वीचा एकच दिवस मिळत असल्याने तो दिवस मांसाहारासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी मासळीसाठी ग्राहकांची मासळी बाजारांच्या ठिकाणी गर्दी होती. मासे महाग असले तरी ग्राहक खरेदी करत होते.
मासळी मार्केटमध्ये पापलेट मासा विक्रीसाठी दिसून आला नाही. अजून सागरी मासेमारी सुरू झाली नसली तरी बिगर यांत्रिकी नौकानी पकडलेला मासा मिरकरवाडा बंदरात विक्रीसाठी उपलब्ध होता. यामध्ये बांगड्याचा किलोचा दर ३.५० रुपये इतका होता. सुरमई ८०० रुपये, बोंबील ३.५० रुपये, मांदेली २०० रुपये किलो दराने विकली जात होती. चालू कोळंबी ३०० ते ३५० रु. किलो दराने आणि व्हाईट कोळंबी ५५० रुपये किलो दराने मिरकरवाडा बंदरात उपलब्ध होती.