रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : Ratnagiri Heavy Rain : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या दिनांक २६ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच संभाव्य अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना शुक्रवारी (२६ जुलै) सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.