पालगड येथील साने गुरुजी यांचे स्मृतीभवन  (Pudhari Photo)
रत्नागिरी

Sane Guruji | पालगडचे सुपुत्र साने गुरुजी: शासकीय अनास्थेमुळे गुरुजींचे स्मृतीभवन दुर्लक्षित

Palgad Smriti Bhavan | ११ जूनरोजी गुरुजींची पुण्यतिथी साजरी होत असताना, त्यांच्या स्मृतीभवनाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले आहे

पुढारी वृत्तसेवा
प्रवीण शिंदे

Sane Guruji Palgad Smriti Bhavan

दापोली: ज्यांच्या कार्यामुळे पालगडसह दापोली तालुक्याचे नाव इतिहासाच्या सुवर्णपानांवर कोरले गेले, त्या साने गुरुजींच्या स्मृती आजही उपेक्षित आहेत. पालगड येथील त्यांचे स्मृतीभवन शासकीय अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिले असून, या राष्ट्रपुरुषाच्या आठवणींना उजाळा देण्याची गरज निर्माण झाली आहे. ११ जूनरोजी गुरुजींची पुण्यतिथी साजरी होत असताना, त्यांच्या स्मृतीभवनाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले जात आहे.

Summary 

  • ११ जून १९५० रोजी साने गुरुजींचे निधन

  • पालगड गावात स्मृतिभवनात त्यांच्या असंख्य आठवणी

  • दापोली, मंडणगड मुख्य मार्गावर पालगड गाव

  • गुरुजींच्या नावाने पालगड गावात शाळा

  • देश स्वतंत्र होऊन ७८ वर्ष झाली तरी साने गुरुजींचे स्मारक उपेक्षित

भारतरत्नांच्या भूमीतील उपेक्षित ठेवा

"भारतरत्नांचा तालुका" अशी ओळख असलेल्या दापोलीच्या पालगड गावी २४ डिसेंबर १८९९ रोजी पांडुरंग सदाशिव साने, अर्थात आपल्या लाडक्या साने गुरुजींचा जन्म झाला. त्यांचे आजोळ आणि गाव दोन्ही पालगडच. याच मातीत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. इयत्ता सातवीपर्यंत पालगडच्या मराठी शाळेत आणि त्यानंतर दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये त्यांनी ज्ञानार्जन केले. पुढील शिक्षणासाठी ते औंधला गेले, त्यामुळे पालगड गावाला त्यांचा सहवास तुलनेने कमी लाभला.

आठवणींचे घर, पण वास्तव्य केळकर यांच्या घरी

१९२४ साली अमळनेरला नोकरीला लागल्यानंतर पालगड येथील गुरुजींचे राहते घर मोडकळीस आले होते. त्यावेळी अमळनेरचे प्राचार्य गोखले यांनी घर बांधण्यासाठी ५०० रुपयांची मदत केली. पालगडचे दानशूर व्यक्तिमत्त्व विठ्ठल बाबाजी बेलोसे यांनी १९२५-२६ च्या सुमारास सागवानी लाकडात, सुंदर कलाकुसर करून हे घर बांधले. शंभर वर्षे उलटूनही या घराची मजबुती आजही टिकून आहे. मात्र, या नूतनीकरण झालेल्या घरात गुरुजी फार काळ राहिले नाहीत. त्यांचे बंधू दादा साने काही काळ येथे राहिले आणि नंतर तेही ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे स्थायिक झाले. गुरुजी अधूनमधून पालगडला येत, पण त्यांचा मुक्काम केळकर यांच्या घरी असे. केळकर कुटुंबीय त्यांना प्रेमाने "पंढरी" म्हणत. १९४७ साली गुरुजी शेवटचे पालगडला आले होते आणि त्यावेळी त्यांनी गावात एक सभाही घेतल्याच्या पुसटशा आठवणी आजही काही ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात.

स्वातंत्र्यलढ्यातील दीपस्तंभ आणि साहित्यातील अजरामर ठेवा

नोकरी सोडून गुरुजींनी स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. याच काळात त्यांनी "श्यामची आई", विविध भाषांतील "गीता प्रवचने" आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" (भारताचा शोध) यांसारख्या अजरामर साहित्यकृतींना जन्म दिला. त्यांचे हे लेखन आजही प्रेरणादायी आहे.

स्मृतीभवनाची उपेक्षा: शासनाची कुचेष्टा?

आज पालगडमध्ये गुरुजींचे स्मृतीभवन उभे आहे, पण ते शासकीय दुर्लक्षाचा बळी ठरले आहे. काही सामाजिक संस्थांनी वेळोवेळी डागडुजी करून या वास्तूला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या थोर समाजसुधारकाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन वेचले, त्या साने गुरुजींचे स्मृतीभवन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही उपेक्षित राहावे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ही एकप्रकारे शासनाकडून होणारी थोर समाजसुधारकांची कुचेष्टाच म्हणावी लागेल. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तरी शासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल आणि गुरुजींच्या स्मृतींना न्याय देईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT