रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत हा महत्वपूर्ण बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून, प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता लहानमुलांना शाळेची गोडी लागणार आहे.
शाळांमधील रिकाम्या व सुस्थितीतील वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी करण्यात येणार आहे. यामुळे लहान मुलांना बाल वयातच शालेय वातावरणाची सवय लागेल व पुढील शिक्षणासाठी त्यांची मानसिक तयारी होण्यास मदत मिळणार आहे.
सध्या अनेक अंगणवाड्या भाड्याच्या जागा, समाजमंदिर किंवा ग्रामपंचायत इमारतींमध्ये सुरू आहेत. नवीन उपक्रमामुळे अंगणवाडीतील मुलांना अधिक सुरक्षित, शैक्षणिक आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्यांव्यतिक्त जास्तीची एखादी खोली सुस्थीतत असले तर ती वर्ग खोली अंगणवाडी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.